आष्टी पोलिसांची शोधले हरविलेले मोबाईल
पोलिस निरीक्षक विशाल काळे यांची माहिती; रिकव्हर केलेल्या 9 पैकी 4 मोबाईल मूळ मालकांच्या ताब्यात
आष्टी (अशोक खंडारे)दि. 4 : हरवलेले मोबाईल शोधून ते मूळ मालकांच्या ताब्यात देण्याच्या मोहिमेत आष्टी पोलिसांनी उल्लेखनीय यश मिळविले आहे. पोलीस निरीक्षक विशाल काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार (दि. 4) रोजी पोस्टे आष्टीच्या पथकाने रिकव्हर केलेल्या 9 मोबाईलपैकी 4 मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना पोलिस ठाण्यात बोलावून परत करण्यात आले.
रिकव्हर करण्यात आलेल्या 9 मोबाईलची एकूण किंमत 1 लाख 70 हजार 89 रुपये इतकी असून, उर्वरित मोबाईलच्या मूळ मालकांचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. संबंधित मालकांची ओळख पटताच त्यांनाही त्यांचे मोबाईल परत देण्यात येणार असल्याचेही पोलिस निरीक्षक विशाल काळे यांनी सांगितले.
आष्टी पोलिसांनी हरवलेले मोबाईल शोधण्याच्या मोहिमेत सातत्यपूर्ण यश मिळविले असून, सन 2026 मध्ये आतापर्यंत एकूण 19 मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत. या मोबाईलची एकूण किंमत 4 लाख 31 हजार 584 रुपये इतकी आहे.
तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, पाठपुरावा आणि तत्पर तपासाच्या बळावर हरवलेले मोबाईल शोधून नागरिकांना परत देण्याचे काम आष्टी पोलिसांकडून सातत्याने सुरू आहे. त्यामुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ होत असून, आष्टी पोलिसांच्या या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

