मूल ते चामोर्शी रेल्वेमार्गाच्या मागणीला वेग; मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून दखल
गडचिरोली, दि. १५ एप्रिल २०२६
जिल्ह्यातील औद्योगिक वाढ, वाढते रस्ते अपघात आणि धार्मिक पर्यटनाची वाढती गरज लक्षात घेता मूल ते चामोर्शी रेल्वेमार्गाच्या मंजुरीची मागणी पुन्हा एकदा जोर धरत आहे. या मागणीची दखल घेत देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाने संबंधित निवेदन पुढील कार्यवाहीसाठी परिवहन व बंदरे तसेच गृह विभागाकडे पाठविल्याची माहिती आज प्राप्त झाली आहे.
चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील प्रस्तावित JSW प्रकल्प, कोनसरी येथील लोह प्रक्रिया प्रकल्प तसेच इतर उदयोन्मुख उद्योगांमुळे या भागातील मालवाहतुकीत मोठी वाढ अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करून अपघातांचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी स्वतंत्र रेल्वेमार्ग उभारणे अत्यावश्यक असल्याचे मत स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.
या विषयावर मार्कंडेश्वर बहुउद्देशीय सुशिक्षित बेरोजगार विकास संस्थेचे केंद्रीय अध्यक्ष श्रीमंत संतोष छबिलदास सुरपाम यांनी (CMS 28404 date 14/04/2011) ला पाटविलेल्या पत्रावर कार्यवाही करत दि २०/०४/२०११ रोजी रेल्वे सचिव रेल मंत्रालय कडे पाटविले होते हे विशेष! तेव्हा पासून सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे यापूर्वीही राज्य व केंद्र स्तरावर पत्रव्यवहार झाला होता; मात्र प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहे.
जिल्ह्यातील वाढत्या उद्योगांसाठी कोळसा, लोखंड, बांधकाम साहित्य तसेच तयार मालाच्या वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षित आणि जलद पर्यायाची गरज निर्माण झाली आहे. रेल्वेमार्ग अस्तित्वात आल्यास उद्योगांना मोठा दिलासा मिळेल, तसेच रस्ते अपघातांत घट होऊन जीवितहानी टाळता येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, चामोर्शीजवळील प्रसिद्ध मार्कंडादेव तीर्थक्षेत्रात दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. रेल्वे सुविधा उपलब्ध झाल्यास धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, असेही मत व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार, “आपला ई-मेल या कार्यालयास प्राप्त झाला असून, सदर ई-मेल योग्य त्या कार्यवाहीसाठी परिवहन व बंदरे तसेच गृह विभाग (विमानचालन) यांना पाठविण्यात आला आहे,” असे कळविण्यात आले आहे.
“गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मूल–चामोर्शी रेल्वेमार्ग तातडीने मंजूर करावा आणि प्रस्तावित उद्योगांना रेल्वे कनेक्टिव्हिटी अनिवार्य करावी,” अशी मागणी श्रीमंत संतोष सुरपाम यांनी पुन्हा एकदा केली आहे.
जिल्ह्याच्या औद्योगिक, सामाजिक आणि धार्मिक विकासाचा पाया ठरणाऱ्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पाबाबत सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नागरिक व विविध सामाजिक संस्थांकडून व्यक्त होत आहे.

