अभयारण्याचा अडसर, जंगलात स्वापदामुळे जाण्याची भीती; तातडीने जलाऊ लाकूड (बिट) उपलब्ध करून देण्याची मागणी
गॅस मिळत नसेल तर करायचे काय?
आष्टी (अशोक खंडारे):-
चामोर्शी तालुक्यातील आष्टी परिसरात सध्या गॅस सिलेंडर बुकिंगची गंभीर समस्या निर्माण झाली असून, नागरिक विशेषतः महिलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गॅस बुकिंगसाठी तब्बल ४५ दिवसांचा कालावधी लागत असल्याने, घरगुती स्वयंपाकाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शासनाचे आदेश आहे की, बुकींग केल्यानंतर ४८ तासात घरगुतीच गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्यात येणार आहे मग
“सिलेंडर संपल्यानंतर पुढील बुकिंग येईपर्यंत एवढा मोठा कालावधी जातो, तर आम्ही स्वयंपाक करायचा तरी कशावर?” असा संतप्त सवाल परिसरातील महिलांनी उपस्थित केला आहे. शासनाने ‘उज्ज्वला’सारख्या योजनांद्वारे गोरगरीब, दिनदुबळे, शेतमजूर यांना गॅस उपलब्ध करून दिला असला, तरी वेळेवर सिलेंडर न मिळाल्याने त्या योजनांचा उद्देशच अपूर्ण ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
दरम्यान, आष्टी परिसर अभयारण्य क्षेत्रात येत असल्याने नागरिकांना जंगलात जाऊन लाकूड आणण्यावरही निर्बंध आहेत. वनविभागाच्या कारवाईची भीती असल्यामुळे नागरिक जंगलात जाण्यास टाळाटाळ करत आहेत. तसेच जंगली स्वापदामुळे जंगलात सरपण आणन्यासाठी जाऊ शकत नाही परिणामी, स्वयंपाकासाठी कोणताही पर्याय उरलेला नाही.
या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी या प्रशासनाकडे तातडीने जलाऊ लाकूड (बिट) उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे. “गॅस वेळेवर मिळत नसेल, तर किमान पर्यायी व्यवस्था तरी शासनाने करावी,” अशी भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.
परिस्थितीचा गांभीर्य लक्षात घेता, संबंधित विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन गॅस पुरवठा सुरळीत करावा तसेच पर्यायी इंधनाची व्यवस्था करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
मागण्या (मुख्य मुद्दे):
गॅस सिलेंडर बुकिंग प्रक्रिया तातडीने सुरळीत करावी
प्रतीक्षा कालावधी कमी करून नियमित पुरवठा करावा
आष्टी परिसरात जलाऊ लाकूड (बिट) उपलब्ध करून द्यावे
अभयारण्य क्षेत्रातील नागरिकांसाठी विशेष सवलतींचा विचार करावा
गॅस टंचाई आणि अभयारण्य निर्बंध यामुळे आष्टी परिसरातील नागरिक दुहेरी संकटात सापडले आहेत. शासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास हा प्रश्न आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
शासणाने या बाबीची तात्काळ पुर्तता करावी अशी मागणी परिसरातील जनतेनी केली आहे

