अमिर्झा येथे ‘सुशासन सप्ताह’ निमित्त महसूल शिबिराचे आयोजन
नागरिकांना विविध दाखल्यांचे वाटप
गडचिरोली: केंद्र शासनाच्या ‘सुशासन सप्ताह’ उपक्रमांतर्गत मौजा अमिर्झा येथे मंगळवार, २३ डिसेंबर रोजी भव्य महसूल व कृषी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात नागरिकांना प्रलंबित असलेले विविध दाखले, सात-बारा आणि शासनाच्या योजनांचे लाभ मिळवून देत सुशासनाचा वस्तुपाठ सादर करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन गडचिरोलीचे तहसीलदार मा. सागर कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमिर्झाचे सरपंच संदीप नामदेव भैसारे होते. प्रमुख अतिथी म्हणून तालुका कृषी अधिकारी सुप्रिया कळमकर, नायब तहसीलदार चंदू प्रधान, मंडळ अधिकारी पी. एम. धात्रक तसेच महसूल अधिकारी व्हि. व्हि. बांडे, एम. बी. गेडाम, एस. व्ही. कोवे, व्हि. एस. कावटी, छाया टेकाम आणि बाम्हणी मंडळातील महसूल सेवक उपस्थित होते.
या शिबिरात महसूल विभागाने तत्परता दाखवत अनेक महत्त्वाच्या दाखल्यांचे वाटप केले. यामध्ये १६ उत्पन्न दाखले, २६ सात-बारा उतारे, १५ नमुना 'आठ-अ' आणि रेशन कार्डांचा समावेश होता. तसेच फेरफार संबंधीची जुनी प्रकरणे निकाली काढण्यात आली. आगामी खरीप हंगाम २०२५-२६ साठी ७२ ऑफलाइन अर्ज स्वीकारून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले
यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी जन निवेदन पोर्टल, मुख्यमंत्री बळीराजा शेत पांदन रस्ते, पीएम किसान, महाडिबीटी योजना, NDKSP पोकरा अंतर्गत योजना आणि ॲग्रीस्टॅक अशा विविध योजनांची माहिती शेतकरी व ग्रामस्थांना दिली. यावेळी ३२ पीएम किसान लाभार्थी आणि महाडिबीटीच्या ४ लाभार्थ्यांना प्रक्रियेत सामाविष्ट करून घेण्यात आले.
तक्रार निवारण आणि अर्ज स्वीकारणे
शिबिरात केवळ दाखले वाटप झाले नाही, तर गावकरी व शेतकऱ्यांच्या अनेक समस्यांवर प्रत्यक्ष सुनावणी घेण्यात आली. यामध्ये आपसी वाटणी, श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, वनहक्क पट्टा आणि रोजगार हमी योजनेच्या थकीत रक्कमेबाबत १२ हून अधिक नागरिकांनी आपल्या तक्रारी मांडल्या. या तक्रारींवर संबंधित विभागाने तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
शिबिरात तक्रारी आणि त्यांचे स्वरूप
शिबिरादरम्यान विविध विभागांच्या कामांबाबत ग्रामस्थांनी लेखी तक्रारी दाखल केल्या. त्यामध्ये प्रामुख्याने खालील बाबींचा समावेश होता:
* महसूल विभाग: पांडुरंग वलादे व वासुदेव बनकर यांनी 'आपसी वाटणी' संदर्भात अर्ज दिले. निरंजना कुळसंगे यांनी जात प्रमाणपत्र, तर अरुण नन्नावरे यांनी ७/१२ दुरुस्ती (कलम १५५ नुसार) बाबत तक्रार केली. मारोती कुळमेथे यांनी वन हक्क पट्ट्याबाबत मागणी केली.
* निराधार योजना: विमल चौधरी, परशुराम चौधरी आणि शवंता चौधरी यांनी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत नसल्याची कैफियत मांडली. तसेच श्रीकांत कापोटे यांनी श्रावणबाळ योजनेबाबत तक्रार दिली.
* नुकसान भरपाई व कृषी: हरीभाऊ मंगर यांनी अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईबाबत, तर श्रीकांत कापोटे यांनी 'पीएम किसान' योजनेच्या लाभाबाबत पाठपुरावा केला.
* ग्रामपंचायत व रोहयो: कैलास चौधरी यांनी शौचालय बांधकामाच्या रोजगार रकमेबाबत, तर सुनंदा नन्नावरे यांनी रोजगार हमी योजनेच्या थकीत रकमेबाबत तक्रार नोंदवली.
मिळालेले लाभ एका दृष्टिक्षेपात:
* उत्पन्न दाखले: १६
* सात-बारा/आठ-अ: ४१
* खरीप ई-पीक अर्ज: ७२ (प्राप्त)
* पीएम किसान लाभार्थी: ३२
* फेरफार अर्ज: २६
कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण संचालन आंबेशिवणीचे ग्राम महसूल अधिकारी व्हि. व्हि. बांडे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार नगरीचे ग्राम महसूल अधिकारी अरविंद शेंडे यांनी मानले. या शिबिराचा अमिर्झा व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.

