अरे, बापरे.. काय ? हे नवलच !. गडचिरोली जिल्ह्यात निघतोय विहीरीतून गरम पाणी
अहेरी तालुक्यातील ताटीगुडम गावातील विहिरीला गरम पाण्याचा झरा
गडचिरोली :- (अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता १९) अहो काय? हे नवल ! अशी म्हणण्याची वेळ आजच्या घडीला गडचिरोली जिल्ह्यात समोर आली आहे
अहेरी तालुका मुख्यालयापासून ४७ किमी अंतरावरील ताटीगुडम गावात गेल्या सहा महिन्यांपासून एक अनोखा निसर्गप्रसंग घडत आहे. सत्यांना मलय्या कटकू यांच्या घरातील विहिरीतून सतत गरम पाणी येत आहे. याबाबत गावकऱ्यांमध्ये प्रचंड कुतूहल निर्माण झाली आहे. पाणी इतके गरम आहे की थेट वापरणे शक्य नाही, त्यात थंड पाणी मिसळावे लागत आहे. विहिरीतून बुडबुडे फुटताना आणि वाफ निघताना दिसते. या घटनेचा अनुभव घेण्यासाठी आसपासच्या गावांमधून लोक येऊन विहिरीतून पाणी काढून तपासत आहेत. हे पाणी इतके गरम कसे येते? हा प्रश्न सर्वांच्या चर्चेचा विषय झाला आहे. काही जणांनी प्रत्यक्ष हातात पाणी घेऊन पाहिले असून - आंघोळीपुरते पाणी उकळून आले आहे, असे सांगितले जात आहे. स्थानिक ग्रामस्थांनी या प्रकरणाची अधिकृत चौकशी प्रशासनाने करण्याची मागणी केली आहे. भूगर्भशास्त्रज्ञ, जलतज्ञ व पर्यावरणतज्ञांच्या मदतीने तापमान, रासायनिक घटक आणि सुरक्षिततेबाबत तपासणी व्हावी, असे सामान्य माणसाचे मत आहे परंतू अशा या घटनेभोवती अंधश्रद्धेला खतपाणी मिळण्याची भीती व्यक्त होत आहे. नक्षलग्रस्त आदिवासीबहुल क्षेत्रात गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेली ही घटना केवळ गावकऱ्यांसाठीच नाही तर संशोधन व प्रशासनासाठीही गूढ ठरली आहे. ताटीगुडमची ही विहीर आता केवळ कुतूहलाचा विषय न राहता शास्त्रीय दृष्टिकोनातून संशोधनाची संधी बनली आहे.
अहेरी तालुका येथील तहसीलदार यांना विचारले असता त्यांनी या बाबतीत माझ्या कडे कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही असे स्पष्ट केले.

