खाटेलाच बनविले रुग्णवाहिका व गंभीर जखमी तरुणास नेले पायदळ तीन किलोमीटर, गडचिरोली जिल्ह्यातील रुग्नसेवेचे तिनतेरा
एटापल्ली:- तालुक्यातील जारावंडी पासून १२ किलोमीटर अंतरावरील पेंदुळवाही येथील एका गंभीर जखमी तरुणास खाटेची रुग्णवाहिका करून तीन किलोमीटर पायपीट करून न्यावे लागल्याची घटना नुकतीच घडली आहे
या घटनेमुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेनेतील उनिवा आणि दिरंगाई पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे
मानिराम रामा हिचामी वय ३५ वर्षे रा . पेदुळवाही या शेतकऱ्याने आपल्या शेतात धानाची रोवणी करण्यासाठी टॅक्टरच्या साहाय्याने चिखल तयार करण्याचे काम सुरू केले होते. दरम्यान, चिखलात टॅक्टर फसले त्याला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात अचानक तो उलटला. या अपघातात मानिरामच्या कंबरेला गंभीर मार लागला तो जोरात ओरडत असताना शेजारील शेतकरी धावत आले व तातडीने मदतकार्य सुरू केले व त्यास बाहेर काढून उपस्थित ग्रामस्थांनी लगेच रुग्णवाहिकेची मागणी केली. मात्र दुर्दैव असे की, जारावंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात या गंभीर वेळेस एकही रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. त्यामुळे मानिरामला चक्क एका खाटेवर झोपवून 3 किलोमीटरचा खडतर जंगलमय रस्ता पायदळी तुडवून पार करून कसुरवाही गावापर्यंत आणण्यात आले एका खासगी वाहनाने जारावंडी रुग्णालयात नेण्यात आले.मात्र तीथे उपचार होऊ न शकल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे पाठवण्यात आले ही बाब आरोग्य प्रशासनासाठी अत्यंत लाजिरवाणी आणि चिंताजनक आहे.
आदिवासी बहुल नक्षलग्रस्त भागात रस्ते व पुलाअभावी रुग्णवाहिका वेळीच उपलब्ध होत नाही ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात पुरेशी साधनसामग्री, डॉक्टरांची अनुपस्थिती आणि वेळेवर मिळणाऱ्या रुग्णवाहिकेचा अभाव या समस्या वारंवार समोर येत असून यामुळे अनेक रुग्णांना जीव गमवावा लागतो किंवा गंभीर आजाराच्या वेळी वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्यांच्या आयुष्यावर मोठा परिणाम होतो.
ग्रामस्थांनी या घटनेनंतर संताप व्यक्त केला असून तातडीने जारावंडी आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी आरोग्य विभागाकडे केली आहे.
आज शासन "सबका साथ, सबका विकास" अशी घोषणा देत अनेक योजना राबवत आहे, डिजिटल इंडिया, स्मार्ट व्हिलेज, आरोग्यवर्धिनी सेवा यांसारख्या मोठमोठ्या संकल्पनांची स्वप्ने पाहिली जात आहेत. पण वास्तवात मात्र, आदिवासी भागातील मूलभूत गरजाही पूर्ण केल्या जात नाहीत पेंदुळवाहीतील अपघातग्रस्त शेतकऱ्याला रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे खाटेवरून पायदळी जंगल पार करीत रुग्णालयात न्यावं लागतं, ही बाब शासनाच्या दाव्यांवर मोठा प्रश्नचिन्ह उभे करते. ही केवळ दुर्लक्षिततेची नाही, तर आदिवासींच्या जीवनमूल्यांना कमी लेखण्याची गंभीर उदाहरण दिसून येते आहे. स्वप्नांची वाटचाल करताना जमिनीवरच्या वेदना विसरल्या जात असतील, तर ती वाटचाल अंतहीन काळोखात नेणारी ठरू शकते असेच म्हणावे लागेल

