अण्णभाऊ साठे जागतिक किर्तीचे साहित्यिक होते - लक्ष्मण (तात्या)मस्के
अशोक वासुदेव खंडारे /मुख्य संपादक वैनगंगा वार्ता
डोंगरगाव (मंगळवेढा) :- रशिया मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा गाणारे थोर साहित्यिक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे खऱ्या अर्थाने जागतिक किर्तीचे साहित्यिक होते असे प्रतिपादन उद्योजक लक्ष्मण (तात्या) मस्के यांनी केले.
ग्रामपंचायत डोंगरगाव व सदगुरू गाडगे बाबा सार्वजनिक वाचनालय डोंगरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ जयंती उत्सव कार्यक्रमात ते बोलत होते तर अध्यक्षस्थानी डोंगरगावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. सारिका विवेक खिलारे ह्या होत्या.
सर्वप्रथम अण्णाभाऊंच्या प्रतिमेला सौ. सारिका खिलारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक भाषणात दैनिक अचूक निदान चे संपादक डी. के. साखरे म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा माणूस हा केंद्रबिंदू आहे. त्यांनी आपल्या साहित्यातून दलीत, शोषित, पिडीत, कष्टकरी व व कामगारांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचे काम केले. तर कामसिद्ध विद्यालय खुपसंगी शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक तुकाराम मेटकरी म्हणाले की, दलीत मागासवर्गीय समाजाला शिक्षणाशिवाय तरणोपाय नसून आज आपल्या गावातील ग्रंथालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अण्णाभाऊ साठे यांचे भरपूर साहित्य उपलब्ध असून त्याचे सर्वांनी वाचन केले पाहिजे. मोबाईलमुळे माणूस स्वतः ला हरवत चालला असून शिक्षणाशिवाय सामाजिक परिवर्तन शक्य नाही.
तर भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष विवेक खिलारे आपल्या भाषणात म्हणाले की, महापुरुषांच्या जयंत्या ह्या केवळ करमणूक म्हणून साजऱ्या न करता त्यांचे विचार आचरणात आणले पाहिजेत. चांगल्याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे व वाईटाला विरोध केला तर शिक्षणाचे सार्थक होईल.
मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बनकर साहेब म्हणाले की, महापुरुषांना जातीच्या चौकटीत न अडकवता त्यांच्या कार्याची भावी पिढी ला ओळख झाली पाहिजे कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, इतिहास विसरणारे कधी इतिहास घडवू शकत नाहीत.
यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य अमोल मेटकरी, ज्येष्ठ नागरिक शिवाजी माने, ग्रंथपाल ज्योतीराम क्षिरसागर, संजय मस्के, हरिबा मेटकरी,
उत्तम सावत , विक्रम साखरे, सचिन मस्के, आबा झेंडे, सोन्या सावंत, संतोष अवघडे, तुकाराम कारंडे,अमोल लटके, तानाजी मिसाळ, मारूती डांगे,दादा खिलारे, बाजीराव साखरे, संजय माळी,मधुकर सावत , दिनेश साखरे,संगम खडतरे, औदुंबर खडतरे, भारत आकळे, चंद्रकांत सुरवसे,मदन चौगुले, संगम मस्के यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. सचिन मस्के यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

