प्राथमिक आरोग्य केंद्र प्रायोगीक तत्वावर खासगी डॉक्टरांकडे चालविण्यास देणार
मुंबई (वृ.सं.) दि. ८ : राज्यातील शिंदे- फडणवीस पवार सरकारने सरकारी शाळांची संस्था व कंपन्यांना दत्तक म्हणून विक्री करण्याचा निर्णय घेतला असताना आता यात नवीन निर्णयाची भर पडली असून ग्रामीण भागात आरोग्य सेवा देणाऱ्या आरोग्य केंद्र व उपकेंद्राची एकप्रकारे विक्री करण्याचा घाट सरकारने घातला आहे. सातरा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्र आणि उपकेंद्र प्रायोगिक तत्वावर पाच वर्षासाठी खासगी संस्थांना | देण्याबाबतचा शासन आदेश ४ ऑक्टोबर रोजी काढण्यात आला आहे. ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला विनामुल्य आरोग्यसेवा देणारे दवाखाने आता खासगी डॉक्टर व संस्थांच्या ताब्यात जाणार आहे हे निश्चित.
ग्रामीण भागातील जनतेला चांगले आरोग्य सुविधा मिळण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि
लहान गावांमध्ये उपकेंद्राची निर्मिती सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत करण्यात आली आहे. राज्यात प्रत्येक गावात आरोग्य केंद्र व उपकेंद्र कार्यरत असून या केंद्रांमधून गोरगरीब जनतेला विविध आरोग्य सुविधा पुरविण्यात येतात. परंतू राज्यातील सरकारने आता या प्राथमिक आरोग्य सुविधा देणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र व त्या अंतर्गत असलेल्या उपकेंद्रांना प्रायोगिक तत्वावर चालविण्यास देण्याचा निर्णय घेतला आहे. याची सुरूवात सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातून झाली असून या तालुक्यातील तळदेव व तापोळा ही दोन प्राथमिक आरोग्य केंद्र आणि त्या अंतर्गत येणारी १४ उपकेंद्रे प्रायोगिक तत्वावर खासगी संस्था किंवा डॉक्टरांना पाच वर्षाकरीता चालविण्यास देण्याचा शासन निर्णय ४ ऑक्टोबर रोजी निर्गमित करण्यात आला आहे. शाळेनंतर आता सरकारी दवाखान्याची विक्री करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेत एकप्रकारे आरोग्य व्यवस्थेवर प्रहार केल्याचे दिसून येत आहे.

