डॉ.गिरीश गांधी यांचेकडे महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी
भुमीअधिग्रहणाच्या प्रश्नाकडे लक्ष केंद्रित करावे अशी केली विनंती
गडचिरोली :- जिल्ह्यात प्रस्तावित विमानतळ, एमआयडीसी तसेच विविध विकास प्रकल्पांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात सुपीक शेती जमिनी अधिग्रहित करण्यात येत असल्याने अनेक शेतकऱ्यांसमोर भूमिहीन होण्याचे संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष तथा कृषी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. गिरीशजी गांधी साहेब यांची भेट घेऊन गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भूमी अधिग्रहणाच्या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधले.
यावेळी महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी विकासाला विरोध नसून विकासाच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये, सुपीक शेती जमिनी विनाकारण अधिग्रहित करण्यात येऊ नयेत आणि शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण व्हावे, अशी भूमिका मांडली. तसेच या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन शेतकऱ्यांचा आवाज राज्य शासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती त्यांनी डॉ. गिरीशजी गांधी साहेब यांच्याकडे केली.
यावेळी साहित्य संघाचे सचिव मानेकर साहेब व माजी जिल्हाध्यक्ष प्रकाशजी इटनकर उपस्थित होते.

