खा.चंद्रशेखर आझाद भर पावसात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याखाली बसले धरणे आंदोलना
दिल्ली :- नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी दिल्लीच्या जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरु आहे. आज या आंदोलनाचा २२वा दिवस आहे. सोमवारी कॉकरोच जनता पार्टीने संसदेवर मोर्चा काढण्याची हाक दिली होती. मात्र, दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरवर अनेक आंदोलकांना रोखून धरले होते. मात्र, उर्वरित आंदोलकांचा एक मोठा जमाव काल दुपारी संसद भवनापासून काही अंतरावर जाऊन धडकला. यानंतर दिल्ली पोलिसांनी या आंदोलकांवर बेछूट लाठीमार केला. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांची डोकी फुटली असून अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. या सगळ्या घटना नंतर भीम आर्मीचे संस्थापक खा. चंद्रशेखर आझाद हे सोमवारी रात्री संसदेच्या परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याखाली धरणे आंदोलनाला बसले.
दिल्ली पोलिसांकडून विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठीमाराच्या विरोधात चंद्रशेखर आझाद यांनी धरणे आंदोलन सुरु केले. काल रात्री दिल्लीत जोरदार पाऊस होता. मात्र, त्या पावसातही चंद्रशेखर आझाद हे छत्री घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याखाली बसून होते. जंतरमंतरवर आज पोलिसांनी तरुण आणि तरुणींसोबत जे लाजीरवाणी कृत्य केले, ते पाहून माझं मन व्यथित झालं आहे. मी जालियनवाला बाग हत्याकांडाच्यावेळी काय झालं ते पाहिलं नाही. पण आज जे काही बघितलं ते पाहून त्या काळ्या अध्यायाची आठवण जागृत झाली. लोकशाहीत प्रत्येकाला शांततापूर्ण मार्गाने आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. जर त्याला बळाचा वापर करुन चिरडायचा प्रयत्न होत असेल तर तो लोकशाही मूल्यांवरील आघात आहे. हीच पीडा आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी मी आज संसद भवनाच्या परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याखाली धरणे आंदोलनाला बसत आहे. विद्यार्थ्यांवरील लाठीमार प्रकरणात संबंधित व्यक्तींवर योग्य ती कारवाई होत नाही तोपर्यंत माझा हा शांततापूर्ण संघर्ष सुरु राहील, असे खा. चंद्रशेखर आझाद यांनी म्हटले.
चंद्रशेखर आझाद हे सातत्याने दिल्लीतील कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. रविवारी रात्री जंतरमंतरवर गुंड घुसवून आंदोलन उधळले जाईल, अशी चर्चा होती. त्यावेळी चंद्रशेखर आझाद हे रात्रभर जंतरमंतरवर आपल्या सहकाऱ्यांसह ठिय्या देऊन बसले होते हे विशेष


