ऐन परीक्षेच्या काळात तीन दिवसांपासून आष्टीतील पथदिवे बंद
विद्यार्थ्यांनी कसे जायचे घरी?
आष्टी (अशोक खंडारे):-
चामोर्शी तालुक्यातील आष्टी शहरात ऐन परीक्षेच्या काळात गेल्या तीन दिवसांपासून पथदिवे बंद असल्यामुळे संपूर्ण गाव अंधारात बुडाले असून विद्यार्थ्यांना आपल्या ट्युशमधून अंधाराचा सामना करावा लागतो आहे त्यामुळे ग्रामपंचायत व विज वितरण कंपनीच्या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यांवर प्रकाश नसल्याने गावकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
गावातील मुख्य रस्ते तसेच वस्ती भागात पथदिवे बंद असल्याने नागरिकांना रात्री घराबाहेर पडताना विंचू साप हे बाहेर पडत असल्याने भीती वाटत आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. अंधारामुळे अपघाताची शक्यता वाढली असून चोरी व इतर अनुचित प्रकार घडण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले की, पथदिवे बंद असल्याची माहिती ग्रामपंचायत प्रशासनाला वारंवार देण्यात आली आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. “गावात मूलभूत सुविधा देणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे, मात्र येथे ती पूर्णपणे अपयशी ठरत आहे,” अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली.
दरम्यान, या समस्येकडे तात्काळ लक्ष देऊन पथदिवे सुरू करण्यात यावेत, अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

