आष्टी पेपर मिल प्लॉंट विक्रीविरोधात कामगारांचे साखळी उपोषण, रोजगार वाचविण्यासाठी संघर्ष तीव्र
सुमारे ४०० कामगारांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह धोक्यात, शासनाकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी
आष्टी (अशोक खंडारे): चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर पेपर मिलशी संबंधित एपीआर सॅक प्लॉंट विक्रीच्या निर्णयाविरोधात कामगारांनी तीव्र आंदोलन छेडले असून मंगळवारपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. या निर्णयामुळे सुमारे ४०० कामगार व त्यांच्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार असल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.
कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, संबंधित प्लॉंटमध्ये कागदी व सिमेंट पिशव्या तसेच इतर उत्पादनांची निर्मिती केली जाते. प्लॉंट विक्रीचा निर्णय घेताना कामगारांना विश्वासात घेतले गेले नाही, असा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे रोजगार गमावण्याची भीती व्यक्त करत कामगारांनी शांततामय मार्गाने साखळी उपोषण आंदोलन सुरू केले आहे.
आंदोलनात ज्येष्ठ कामगार नेते व पदाधिकारी सहभागी झाले असून मोठ्या संख्येने कामगारांनी ऐक्य दर्शविले. कामगार संघटनेतर्फे मुख्यमंत्री व संबंधित पालकमंत्र्यांना निवेदन पाठवून निर्णयाचा पुनर्विचार करावा, कामगारांचे रोजगार व हक्क सुरक्षित ठेवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून चर्चेद्वारे तोडगा काढण्याचे संकेत दिले आहेत. कामगारांनी मात्र ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे.

