खोके आमदारांच्या मतदार संघातच दुष्काळ जाहीर - विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार
नागपूर :-
कर्नाटकाच्या धर्तीवर राज्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आम्ही सरकारला केली होती, मात्र मुख्यमंत्री सत्ताधारी पक्षाच्या ठराविक आमदारांच्या मतदारसंघात दुष्काळ घोषित करत राजकारण करत असल्याची टीका विरोधी पक्ष नेते, विजय वडेट्टीवार यांनी केली. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते.
राज्यात दुष्काळाची स्थिती आहे. सरकार याबाबत गंभीर नाही. काही ठराविक आमदाराच्या जिल्ह्याला फायदा पोहचवण्यासाठी सरकार राजकारण करत आहे. " खोके " आमदारांची मर्जी राखण्यासाठी सरकार हे काम करत असून शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक केली जात आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. यातून पीक विमा कंपन्यांना फायदा पोहोचण्याचे काम सरकार करत आहे.
सात हजार कोटी रुपये विमा कंपनीना वाटले असताना केवळ १३०० - १४०० कोटी रुपये राज्याला नुकसान भरपाई स्वरूपात मिळणार आहे असेही वडेट्टीवार म्हणाले. या प्रश्नावर आम्ही नागपुरात होणारे हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही. सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करुन सोडणार आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.

