दलित शोषितांसाठी संघर्ष हाच रिपब्लिकन पक्षाचा नारा - बाळासाहेब खोब्रागडे यांचे प्रतिपादन
गडचिरोली - :
देशातील दलित आणि वंचितांसाठी संघर्ष हे रिपब्लिकन पक्षाचे नेहमीच घोषवाक्य आणि कार्य राहिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरां नंतर बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी आपल्या कणखर आणि सक्षम नेतृत्वाने हा पक्ष देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला. मागासवर्गीयांचे प्रश्न अद्याप संपलेले नाहीत, त्यामुळे पुन्हा एकदा रिपब्लिकन पक्षाला बळकट करून लोकांसाठी लढणे ही काळाची गरज आहे, असे आवाहन अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण उर्फ बाळासाहेब खोब्रागडे यांनी केले.
रविवारी येथील केमिस्ट भवन येथे पक्षाच्या जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष हंसराज उंदीरवाडे अध्यक्षस्थानी होते. पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, अशोक निमगडे , कोषाध्यक्ष प्रतीक डोर्लीकर , रिपब्लिकन स्टुडंट्स फेडेरेशनचे अध्यक्ष राजास खोब्रागडे, राज्य उपाध्यक्ष कुलपती मेश्राम, केंद्रीय सदस्य राजाभाऊ खोब्रागडे, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष प्रेमदास बोरकर बीआरएसपी चे जिल्हा प्रभारी राज बनसोड , आदिवासी युवा परिषदेचे विनोद मडावी हे मान्यवर नेते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते..
खोब्रागडे पुढे म्हणाले की, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याकांवर अन्याय होत असल्याने सध्याच्या परिस्थितीत रिपब्लिकन पक्षासारख्या राजकीय संघटनेची अधिक गरज आहे. त्यामुळे सर्व रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे, असेही ते म्हणाले.
श्री.निमगडे म्हणाले, सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणामुळे आरक्षणाला थेट धोका निर्माण झाला आहे. प्रतिगामी शक्ती मागासलेल्यांना कमकुवत करण्यासाठी समस्या निर्माण करत आहेत. त्यांचे दुष्ट मनसुबे हाणून पाडावे लागतील. जनतेवर असा अन्याय होत असताना रिपब्लिकन शांत बसणार नाहीत. याचा आपण एकत्रितपणे सामना केला पाहिजे.
रोहिदास राऊत म्हणाले की, रिपब्लिकन पक्षाला केवळ संघर्षाचाच नाही तर संसदीय यशाचा इतिहास आहे. पक्षाचा सुवर्णकाळ परत आणावा लागेल आणि प्रत्येक रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी या कार्यात हातभार लावावा. येत्या निवडणुकीत रिपब्लिकन धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी पक्षांसोबत उभे राहतील, असे त्यांनी जाहीर केले.
यावेळी प्रतिक डोर्लीकर, राजस खोब्रागडे, प्रेमदास बोरकर, कुलपती मेश्राम यांचीही भाषणे झाली व कार्यकर्त्यांनी पक्ष सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
रोहिदास राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त श्री.बाळासाहेब खोब्रागडे व इतर मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या सुविद्य पत्नी अरुणi राऊत यांचेसह स्मृतिचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
आरमोरी विधानसभा अध्यक्ष कृष्णा चौधरी, जिल्हा सरचिटणीस प्रल्हाद रायपुरे, कार्यालय सचिव अशोक खोब्रागडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष नीता सहारे, सरचिटणीस ज्योती उंदीरवाडे, युवा आघाडी अध्यक्ष नरेंद्र रायपुरे, उपाध्यक्ष तैलेश बांबोडे, डॉ.हरिदास नंदेश्वर, दुर्योधन सहारे, शहर अध्यक्ष अनिल बारसागडे, जिल्हा सचिव विशालसिंग परिहार, आदिवासी आघाडी अध्यक्ष पुनेश्वर वड्डे महिला शहर अध्यक्ष वनमाला झाडे, प्रतिमा बोदेले, ज्योती चौधरी, वंदना भैसारे हे सुद्धा यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक केशवराव समृतवार यांनी, संचालन प्रा.राजन बोरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रदीप भैसारे यांनी केले. कार्यक्रमाला पक्षाचे कार्यकर्ते व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

