संभ्रम निर्माण करणारी वेबसाईट महाराष्ट्रात गेल्या तिन महिन्यात ३ हजार५९४ मुली बेपत्ता
अशोक खंडारे मुख्य संपादक
महाराष्ट्रातून गेल्या तीन महिन्यात16 ते 25 वयोगटातील 3 हजार594 मुली बेपत्ता झाल्या आहेत. महाराष्ट्र राज्य सरकारच्या वेबसाईटवर असलेली महिला आणि मुली बेपत्ता होण्याची आकडेवारी चिंताजनक आहे, असे म्हणत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रशासनाला जाब विचारल्याने शहरात दिवसभर हा विषय चर्चेचा ठरला. अनेकांनी आज त्या वेबसाईटवर माहिती घेतली असता बेपत्ता होण्यात चंद्रपूर जिल्ह्यातील 101 मातृशक्तीचाही समावेश आहे, असे स्पष्ट झाले. प्रत्यक्षात मात्र 16 मुली बेपत्ता आहेत, अशी माहीती पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेसी यांनी नवराष्ट्रला दिल्याने शासनाच्या पोलीस विभागाच्या वेबसाईटवरील माहिती संभ्रम निर्माण करणारी ठरत आहे. वेबसाईट नुसार 1 जानेवारी ते 31 मार्च दरम्यान राज्यातील 3 हजार 594 महिला हरवल्या आहेत, यातील काहींचा शोध लागला असला तरी एकंदरीतच ही गंभीर बाब आहे. नोकरी, लग्न, प्रेमाचं आमिष दाखवून मुलींची दिशाभूल करुन त्यांचे लैंगिक शोषण केले जात असल्याचेही समोर आलं आहे. राजकारण सोडून राज्य सरकारने आधी मुली बेपत्ता होण्याच्या प्रकरणाकडे लक्ष द्यावे. मुली बेपत्ता होण्याचा आकडा प्रचंड वाढत आहे, असेही रुपाली चाकणकर यांनी
म्हटले आहे.
अशी आहे बेपत्ता युवतींची जिल्हानिहाय आकडेवारी
अहमदनगर 184, अकोला 41, अमरावती शहर 31, अमरावती ग्रामीण 63, औरंगाबाद शहर 66, औरंगाबाद ग्रामीण 52, बीड 27, भंडारा 23, मुंबई शहर 383, बुलढाणा 76, चंद्रपूर 101, धुळे 45, गडचिरोली 13, गोंदिया 46, हिंगोली 14, जळगाव 121, जालना 36, कोल्हापूर 127, लातूर 42, मीरा-भाईंदर 113, नागपूर शहर 108, नागपूर ग्रामीण 169, नांदेड 36, नंदुरबार 37, नाशिक शहर 93, नाशिक ग्रामीण 169, नवी मुंबई 75, उस्मानाबाद 34, पालघर 28, परभणी 27, पिंपरी चिंचवड 143, पुणे शहर 148, पुणे ग्रामीण 156 अशी बेपत्ता तरुणींची संख्या आहे. या सर्व बेपत्ता तरुणी 16 ते 25 वयोगटातील आहेत.
अशी आहे चंद्रपूर जिल्ह्याची स्थिती
पोलीस अधीक्षक परदेसी यांनी दिलेल्या माहितीनुसार 2023मध्ये
एकूण 96 व्यक्ती बेपत्ता (मिसिंग) होते. यात 14 मुले व 82 मुलींचा
समावेश होता. यापैकी 66 मुली सुखरूप परतल्या तर 14 पैकी 12
मुलांना शोधण्यात पोलिसांना यश आले. आता 2 मुलं व 16 मुलींचा शोध सुरू आहे.
म्हणून आकडे फुगलेले दिसतात
सुप्रीम कोर्टच्या निर्देशानुसार बेपत्ता होणाऱ्याचे वय 18 पेक्षा कमी असेल तर पळवून नेल्याचाच गुन्हा कलम 363 आतंर्गत दाखल करावा लागतो. प्रत्येक प्रकरण गांभीर्याने घेण्याचे निर्देश आहेत. म्हणून तपासही त्या दिशेने चालतो. म्हणून आकडे फुगलेले दिसतात अशीही
माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
07 वर्षात पोलिसांनी आणले 1314 मुलांना परत मागील 7 वर्षात चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण 1357 मुलं-मुली बेपत्ता झाली. यापैकी 1314 मुलं मुलींना शोधून त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. आता फक्त 55 चा शोध बाकी आहे. ज्यात 8 मुलं व 47. मुलींचा समावेश आहे. चंद्रपूर पोलीस या विषयाकडे अतिशय गांभीर्याने बघते. असे पोलीस अधीक्षक परदेसी म्हणाले.

