प्रविण तिवाडे कार्यकारी संपादक वैनगंगा वार्ता
लाखनी (जि. भंडारा) : परीक्षेचा अभ्यास सोडून मुलगा मोबाईल पाहात असल्याने वडील रागावले. यावरून मुलाने रात्री टायने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री चान्ना / धानला येथे घडली.
हिमांशू गुणेश राघोर्ते (वय १५) असे मृताचे नाव आहे. तो समर्थ विद्यालयाचा नवव्या वर्गातील विद्यार्थी होता. या घटनेने परिसरात
शोककळा पसरली आहे.
चान्ना येथील गुणेश राघोर्ते यांचे लाखनी येथे स्पेअर पार्ट विक्रीचे दुकान आहे. त्यांचा मुलगा हिमांशू हा समर्थ विद्यालयात वर्ग नववीमध्ये शिकत होता. सध्या शाळेची वार्षिक परीक्षा सुरू असून शनिवारी इंग्रजी विषयाचा पेपर होता.
मात्र, शुक्रवारी घरी हिमांशू अभ्यास न करता मोबाईल पाहत होता. त्यावरून त्याच्या वडिलांनी अभ्यास का करत नाही? म्हणून हटकले होते. त्यानंतर रात्री कुटुंबीय झोपी गेले. पण, अभ्यास करून नंतर झोपतो असे म्हणून हिमांशू हॉलमध्ये थांबला होता. त्याचे आई वडील घरात झोपले. रात्री सव्वा अकराच्या सुमारास त्याचे वडील लघु शंकेसाठी उठले.
तेव्हा हिमांशू हॉलमधील स्लॅबच्या लोखंडी हुकला शाळेची टाय बांधून गळफास लावलेल्या स्थितीत दिसून आला. त्यांनी लगेच त्याला खाली उतरवून उपचारासाठी लाखनी येथे ग्रामीण रुग्णालयात आणले.
परंतु, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती लाखनी पोलिसांना देण्यात आली. आज शनिवारी (ता. ८) शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. चान्ना येथे शोकाकुल वातावरणात हिमांशूच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लाखनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून घटनेचा तपास सुरू आहे.
मोबाईल झाला जीव की प्राण
आजच्या काळात मोबाईल फोन सर्वच क्षेत्रातील व्यक्तीसाठी महत्त्वाचा झाला आहे. मात्र, कोरोना संकट काळातील ऑनलाइन शिक्षणापासून विद्यार्थ्यांमध्ये तो कमालीचा लोकप्रिय झाला आहे. त्यामुळे हवे ते फिचर असलेला व हव्या त्या ब्रॅन्डच्या फोनसाठी मुले टोकाचा निर्णय घेत आहेत. लहान मुलांचा त्रास कमी व्हावा, याकरिता आईवडीलही स्वत: त्यांच्या हातात हा जादूगर सोपवित आहेत. मोबाईलचा अधिक वापर केल्यामुळे मुले पटकन टोकाचा निर्णय घेत आहेत.

