भारतीय बौद्ध महासभेने केला गुणवंतांचा सत्कार
गडचिरोली,-- भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा शाखेतर्फे येथील सम्यक बुद्ध विहार सभागृहात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महासभेचे जिल्हाध्यक्ष तुलाराम राऊत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार रोहिदास राऊत, ॲड. बोधी रामटेके, डॉ. प्रफुल वाळके, महिला आघाडीच्या अध्यक्षा सुरेखा बरसागडे आणि निवृत्त तहसीलदार महेंद्र गनवीर यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी, इयत्ता १० वी मध्ये ९० टक्क्यांहून अधिक आणि इयत्ता १२ वी मध्ये ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव प्रमाणपत्रे तसेच 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' आणि 'भारतीय संविधान' या पुस्तकांच्या प्रती देऊन करण्यात आला.
सत्कारमूर्ती विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता १० वीचे धनश्री बोरकर, आरुषी सहारे, तर्का रामटेके, माही अंबाडे, शांतनू खोब्रागडे, अनाध खोब्रागडे, आदिश्री भैसारे, स्वर्णिम झाडे, स्वरस उके, आदर्श कांबळे, राजरतन सहारे, प्रत्युष निचाळे आणि आरुषी रतन सहारे; तसेच इयत्ता १२ वीचे तन्मय बांबोळे व प्रभा राजेंद्र दर्डे आणि NEET परीक्षेतील मोहित गनवीर यांचा समावेश होता.
कार्यक्रमात बोलताना रोहिदास राऊत यांनी सांगितले की, केवळ शिक्षणाद्वारेच जागतिक ओळख आणि मान्यता प्राप्त करता येते. त्यांनी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्याचे आणि आयुष्यात मोठे यश संपादन करण्याचे आवाहन केले. तसेच, पालकांनी आपल्या मुलांमध्ये सामाजिक जाणीव रुजवतानाच त्यांना आधार द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
ॲड. बोधी रामटेके यांनी शिक्षणाचा उद्देश स्पष्ट करताना विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्कांसाठी लढा देण्याचे आणि सामाजिक कार्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. संघर्ष हा केवळ स्वार्थापुरता मर्यादित नसावा यावर त्यांनी भर दिला आणि विद्यार्थ्यांना आठवण करून दिली की ते समाजाचा अविभाज्य भाग आहेत व समाजाचे त्यांच्यावर ऋण आहे.
जिल्हा सरचिटणीस प्रा. गौतम डांगे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले, तर उपाध्यक्ष मोरेश्वर अंबाडे यांनी प्रास्ताविक केले. शहर अध्यक्ष सूर्यभान घुटके यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले आणि अर्चना भैसारे यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाला विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

