जातिनिहाय जनगणना व आरक्षणाच्या मागण्यांसाठी चंद्रपुरात ओबीसींचा विराट महामोर्चा
चंद्रपूर :- ओबीसी समाजाच्या हक्क व अधिकारांच्या संरक्षणासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नेतृत्वाखाली ओबीसी, एससी, एसटी, व्हीजे, एनटी, एसबीसी तसेच विविध सामाजिक संघटनांच्या वतीने चंद्रपूर येथे भव्य महामोर्चा काढण्यात आला. गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा निघालेल्या या महामोर्चात हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या मागण्यांसाठी एकजूट दाखविली.
महामोर्चादरम्यान ओबीसी समाजाची जातिनिहाय जनगणना तातडीने करण्यात यावी, तसेच महाराष्ट्र शासनाने आरक्षणासंदर्भात १४ मे २०२६ रोजी घेतलेला कॅबिनेट मंत्रिमंडळाचा निर्णय रद्द करण्यात यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. विविध वक्त्यांनी ओबीसी समाजाच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, अशी भूमिका मांडली.
या महामोर्चात गडचिरोली जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी, युवक, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले. तसेच इतर राज्यांतील ओबीसी चळवळीतील नेते व प्रतिनिधींनीही उपस्थित राहून आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शविला.

