विमानतळासाठी सुपीक जमीन अधिग्रहण करुन शेतकऱ्यांची भाकर हिसकावू नका -खा. डॉ नामदेव किरसान
गडचिरोली:-
प्रस्तावित विमानतळासाठी हिरापूर, गुरवळा, राखी आणि शिरपूर परिसरातील सुपीक जमिनींचे सर्वेक्षण सुरू करण्याच्या हालचालींविरोधात शासकीय विश्राम भवन गडचिरोली येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ.नामदेवजी किरसान व गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
यावेळी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनीही पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. शेतकऱ्यांच्या भावना आणि त्यांच्या जमिनींचे महत्त्व शासनाने समजून घेतले पाहिजे, असे ते म्हणाले. विकास आवश्यक असला तरी तो शेतकऱ्यांवर अन्याय करून होऊ नये. स्थानिक नागरिकांच्या संमतीशिवाय कोणताही निर्णय घेणे योग्य ठरणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवून न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे आश्वासनही त्यांनी दिले.
तसेच उपजिल्हाधिकारी यांच्याकडेही शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात हिरापूर, गुरवळा, राखी आणि शिरपूर येथील सुपीक जमिनी विमानतळासाठी अधिग्रहित करू नयेत, पर्यायी जागेचा विचार करावा आणि शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय कोणतीही कारवाई करू नये, अशी मागणी करण्यात आली.

