शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय गडचिरोली येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा संपन्न
उत्तम गुणप्राप्ती सोबतच उत्तम नागरिक घडवणे हेच संस्थेचे ध्येय - सहसचिव गोविंदराव बनबले
गडचिरोली (अशोक खंडारे):-
केवळ परीक्षेत उत्तम गुण मिळवणे म्हणजे यश नव्हे, तर विद्यार्थ्याला देशाचा एक सुजाण आणि उत्तम नागरिक म्हणून घडवणे हेच आमच्या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन शिवाजी शिक्षण मंडळ गडचिरोलीचे सहसचिव गोविंदराव बानबले यांनी केले.
स्थानिक शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय गडचिरोली येथे आयोजित १० वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. ८ मे २०२६ रोजी जाहीर झालेल्या १० वीच्या निकालात विद्यालयाने दैदिप्यमान यश संपादन केल्याबद्दल या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावर्षीच्या निकालात विद्यालयाची विद्यार्थिनी कृतिका गुरुदेव चापडे हिने ९६% गुण मिळवून शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळवलाच, सोबतच गडचिरोली जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीतही द्वितीय स्थान पटकावून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.तसेच ऋतुजा मोसम मेश्राम: ९२.२०% (द्वितीय) योग उमेश पालकर: ९०.५०% (तृतीय) तसेच अवनी अश्विन मस्के (८९.२०%), शिलेश राजू कुनघाडकर (८९.२०%), आकांक्षा जितेंद्र गोन्नाडे (८६.८०%), ओमकार घनश्याम सातपैसे (८५.८०%), भाग्यश्री पांडू मट्टामी (८५.६०%), अरमान मो.जावेद शेख (८५.२०%), तन्वी जनार्दन नैताम (८५%), भूषण मनोहर सयाम (८५%), आदर्श पुरनदास टेंभुर्णे (८४.४०%) आणि श्रुती जितेंद्र टिकले (८२%) या विद्यार्थ्यांनीही विशेष प्राविण्य मिळवत उत्तम यश संपादन केले.
यावर्षी या विद्यालयातून एकूण ३०५ परीक्षेला बसले होते, त्यापैकी २६६ विद्यार्थी यशस्वी झाले असून शाळेचा एकूण निकाल ८८ टक्के लागला आहे. या निकालात विशेष प्राविण्य (Distinction) ३६ विद्यार्थी,प्रथम श्रेणी ६९ विद्यार्थी,द्वितीय श्रेणी ९२ विद्यार्थी,तर उत्तीर्ण श्रेणीत ६९ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
यावेळी यशस्वी विद्यार्थी आणि पालकांचा मान्यवराच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. यशस्वी विद्यार्थी आणि पालक यांनी आपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी संस्थेचे ज्येष्ठ सदस्य शरद पाटील ब्राह्मणवाडे, ज्येष्ठ सदस्य तथा प्राचार्य अरुण पाटील मुनघाटे, उपमुख्याध्यापक डी.आर. चौधरी, पर्यवेक्षक एस.एस. चुधरी, आर.व्ही. जंगावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य अरुण पाटील मुनघाटे यांनी केले, ज्यामध्ये त्यांनी विद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे संचालन प्रणय उराडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक एस.एस. चुधरी यांनी मानले. या सोहळ्याला शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

