कामगारांच्या संघटनात्म लढा ठरला यशस्वी ,आष्टी पेपर मिल बॅग उद्योग व्यवस्थापनाकडून मागण्या मान्य
आष्टी (अशोक खंडारे);-
आष्टी येथील अवंता होल्डिंग लिमिटेड समूहातील पेपर बॅग उद्योगातील कामगारांच्या मागण्यांना अखेर न्याय मिळाला आहे. कामगार नेते आष्टी पेपर मिल मजदूर सभा युनियन व बीजीपीपीएल कामगार संघटना यांच्या नेतृत्वाखाली स्थायी व अस्थायी अशा सुमारे ४०० कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी २४ फेब्रुवारीपासून साखळी उपोषण आंदोलन सुरू केले होते. तब्बल ७७ दिवस चाललेल्या या आंदोलनामुळे उद्योग परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
कामगारांच्या मागण्यांबाबत विभागीय कामगार आयुक्त यांच्या मध्यस्थीने नागपूर येथे अनेक बैठका घेण्यात आल्या. उद्योग व्यवस्थापन, कामगार संघटना व प्रशासन यांच्यात सविस्तर चर्चा झाल्यानंतर अखेर सर्वानुमते तोडगा निघाला. व्यवस्थापनाने कामगारांच्या महत्त्वाच्या मागण्या मान्य केल्याने कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
‘या’ मागण्या झाल्या मान्य
अवंता होल्डिंग लिमिटेडच्या पेपर बॅग उद्योगाचे स्थलांतर होणार नाही.
१४.०६ एकर जमीन बीजीपीपीएल उद्योग समूहाने हस्तांतरित करावी.
‘अवंता’ कंपनी लीज पद्धतीने नवीन उद्योग सुरू करेल.
कामगारांसाठी कल्याण निधी म्हणून ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल.
बीजीपीपीएलच्या खात्यावर राखीव निधी ठेवण्यात येणार असून कामगारांच्या आपत्कालीन गरजांसाठी त्याचा वापर केला जाईल.
प्रकल्पग्रस्त कुटुंबातील बेरोजगार सदस्यांना नवीन उद्योगात रोजगार देण्यात येईल.
कामगारांच्या वेतनवाढीचा करार डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.
बैठकीनंतर कामगारांनी जल्लोष करत आपल्या नेतृत्वाचे आभार मानले. या संघर्षात कामगारांनी दाखविलेली एकजूट आणि संयम यामुळेच हा विजय शक्य झाल्याची भावना कामगार नेत्यांनी व्यक्त केली.
यावेळी उद्योग समूहाचे प्रतिनिधी, कामगार संघटनांचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते.

