एम. बी.बी.एस. ला जाण्यापुर्वीच केली तरुणाने आत्महत्या
नवरगाव (चंद्रपूर)
(२३ सप्टेंबर २०२५): शिक्षणासाठी साडेपाच वर्षे लागतात आणि लाखो रुपये खर्च होत असतात त्यापेक्षा मला व्यवसाय करायचा होता, अशी सुसाइड नोट लिहून अनुराग अनिल बोरकर (२०) या 'एमबीबीएस'च्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना मंगळवारी पहाटे नवरगाव येथे घडली. विशेष म्हणजे, अनुराग त्याच दिवशी सकाळी शिक्षणासाठी गोरखपूरला निघणार होता.
अनुराग हा नवरगाव येथील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अनिल बोरकर यांचा मुलगा असून, तो अभ्यासात अत्यंत हुशार होता. त्याने नीट युजी २०२५ परीक्षेत ओबीसी कॅटेगरीमधून १४७५ वा रँक मिळवून 'एमबीबीएस'मध्ये प्रवेश मिळवला होता. शिक्षणासाठी गोरखपूरला जाण्याची त्याची सर्व तयारी झाली होती.
मंगळवारी सकाळी त्याची आई त्याला उठवण्यासाठी गेली असता, तो खोलीत नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असता, त्याच्या खिशात एक सुसाइड नोट सापडली.
त्या सुसाइड नोटमध्ये त्याने लिहिले होते, "साडेपाच वर्षे वेळ आणि 'एमबीबीएस'साठी लागणारा पैसा खर्च करण्यापेक्षा मला व्यवसाय करायचा होता, त्यामुळे मी आत्महत्या करणार आहे."
पोलिसांनी शवविच्छेदनानंतर अनुरागवर नवरगाव येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

