आदिवासींनी पोलिसांना तोडगट्टा गावाजवळ घातला घेराव, पोलीसांनी आठजणांना घेतले ताब्यात

0
 आदिवासींनी पोलिसांना तोडगट्टा गावाजवळ घातला घेराव, पोलीसांनी आठजणांना घेतले ताब्यात 


समजूत घातल्यानंतर काही माघारी फिरले, खाणविरोधी आंदोलनाचा परिणाम असल्याचे पोलिसांकडून सांगितल्या जात आहे 

गडचिरोली:-

गडचिरोली जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम भाग असलेल्या तोडगट्टा येथील आदिवासी ग्रामस्थांनी महाराष्ट्र-छत्तीसगढ़ सीमेवरील वांगीतुरीकडं मार्गस्थ असलेल्या पोलिस पथक, सी-६० जवानांना अडवत घेराव घातल्यानं खळबळ उडाली. सोमवारी (ता. २०) पोलिसांना हा घेराव घालण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे 

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेजवळ हा प्रकार घडल्यानं गडचिरोली पोलिस विभाग तातडीनं 'अलर्ट' झाला. तोडगट्टामार्गे वांगेतुरीकडे जात असलेल्या पोलिस पार्टी आणि सी-६० कमांडो पथकातील जवानांनी तातडीनं कारवाई केली. आठ जणांना या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलंय, गेल्या २५० दिवसांपासून तोडगट्टा येथे लोह खाणीविरोधात आंदोलन सुरू आहे. त्यातून हा प्रकार घडल्याचं सांगण्यात येत आहे आंदोलनानंतर पोलिसांनी आदिवासींच्या झोपडयांची नासधूस केल्याचा आरोप करण्यात आला. गडचिरोली पोलिसांनी सर्व आरोप फेटाळले. येथे सुरू असलेल्या आंदोलनाला माओवाद्यांकडून चिथावणी मिळत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. 
गडचिरोलीतील माओवाद्यांच्या हिंसक कारवायांना चाप लावण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोलिस बल काम करीत आहेत. महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर माओवादी कारवाया अधिक असल्यानं एटापल्ली तालुक्यातील महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर वांगेतुरी येथे पोलिस स्टेशन उभारण्यात आले आहे. या
पोलिस ठाण्यातून सोमवारी (ता. २०) प्रत्यक्ष कामाला सुरुवात
होणार होती. त्यासाठी उदघाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
गडचिरोली पोलिस मुख्यालयाच्या ठिकाणावरून पोलिस व सी-६० जवानांचं पथक वांगेतुरीकडे मार्गस्थ होतं. गट्टा पोलिस पथक आणि कमांडोज तोडगट्टाजवळ पोहोचल्यानंतर त्यांना आदिवासींनी अडवलं, या प्रकारामुळे तणाव निर्माण झाला. अनेक वेळा आदिवासींना पुढे करीत माओवादी पोलिसांवर हल्ला करतात, असा अनुभव आहे. त्यामुळे जवानांनी आसपास 'पोझिशन' घेतली.
महाराष्ट्र-छत्तीसगढ़ सीमेवरील तौडगट्टा येथे गेल्या २५०
दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. तालुक्यात होत असलेल्या
लोहखाण प्रकल्पाला व सूरजागड प्रकल्पाला स्थानिक आदिवासी नेत्यांचा विरोध आहे. पेसा आणि ग्रामसभेचे कायदे पायदळी तुडवत खाणींना मान्यता देण्यात येत असल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे दमकोंडी बचाव संघर्ष समितीनं ग्रामसभांचे
साखळी आंदोलन सुरू केलं आहे, वसेवाहा, दमकोंडावाही
येथील खाणींनाही ग्रामसभांचा विरोध आहे. सुमारे ४० पेक्षा जास्त ग्रामसभा या आंदोलनात सहभागी आहेत.
एटापल्ली तालुक्यात केवळ खाणींना मान्यता देण्यात येत आहेत. या भागात राज्य सरकारनं आधी मूलभूत सुविधा द्याव्यात व नंतरच खाणींना मान्यता द्यावी, अशी आंदोलनकर्त्याची मागणी आहे. त्यातूनच सोमवारी आंदोलकांनी पोलिसांना अडवत घेराव घातल्याचं सांगण्यात येत आहे. आंदोलकांनी
अडविल्यानंतर या भागात प्रचंड मोठी सशस्त्र कुमक मागविण्यात आली. पोलिसांनी गावात घुसत आदिवासींच्या झोपड्यांची नासधूस केली, असा आरोप आंदोलक नेत्यांनी केला. आंदोलनकर्त्या पैकी काहींना माओवाद्यांची फूस असल्याने
ते ऐकत नव्हते, त्यामुळे केवळ आठ जणांना ताब्यात घेतलं.गावात पोलिसांनी कोणतीही नासधूस केली नाही, असं गडचिरोली पोलिसांनी सांगितलं आहे 
गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल म्हणाले, सोमवारी
वांगीतुरा येथे पोलिस ठाण्याचे उद्‌द्घाटन होते. या भागात
माओवाद्यांच्या कारवाया सर्वाधिक आहेत. त्यामुळं दोनदिवसांपासून आम्ही परिसरातील गस्त वाढवलीय. त्यामुळ पोलिसांची संख्या जास्त राहणं स्वाभाविकच होतं. पोलिस
वांगीतुरीकडे जात असताना त्यांना अडवण्यात आलं, काही
आंदोलकांनी हुज्जत घालत आततायीपणा केला. त्यामुळे त्यांना ताब्यात घेतले आहे. माओवाद्यांची फूस असल्यानं काही नेते आंदोलन करीत आहेत. आठ महिन्यांपासून हे आंदोलन सुरू आहे. परंतु माओवाद्यांच्या दबावाला आदिवासी ग्रामस्थ कंटाळले आहेत. ग्रामस्थांनी आंदोलनस्थळी असलेल्या झोपड्या स्वतःहूनच काढल्या, पोलिसांनी कोणतीही तोडफोड केली नाही.माओवादी नेत्यांना चिथावणी देतात व आम्हाला बंदुकीचा धाक दाखवतात, असं आदिवासींनीच पोलिसांना सांगितल्याचं ते म्हणाले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !