चामोर्शी तालुक्यातील कोतवाल भरती प्रकरणाची चौकशी करा वंचित ची मागणी
प्रमोद झरकर उपसंपादक वैनगंगा वार्ता १९
गडचिरोली:-
चामोर्शी तालुक्यातील कोतवाल भरतीमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करून तहसीलदारांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने आज २३ ऑक्टोबर रोजी स्थानीक प्रेसक्लब भवनात आयोजित पत्रकार परीषदेत केली.
पत्रकार परिषदेत माहिती देतांना वंचितचे जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे म्हणाले की, साजा क्र. २७ वायगांव येथील उमेदवार प्रतिक्षा जवादे ही कोतवाल भरती परिक्षेत प्रथम येऊन सुध्दा दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमेदवाराची निवड करण्यात आली. परीक्षेतील प्रश्नोत्तर पेपरवर पर्यवेक्षकांची सही नाही. प्रश्नोत्तर पेपरवर असलेल्या उमेदवाराच्या सह्या सुध्दा खोट्या असल्याचे दिसून येते. तसेच तालुक्यातील आठही गावाच्या कोतवालाची जी निवड झालेली आहे, त्या निवड झालेल्या उमेदवारात व दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमेदवारात दोन-दोन गुणाचाच फरक आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया शासनाच्या नियमांची पायमल्ली करुन परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची दिशाभूल करणारी आहे.
त्यामुळे खऱ्या उमेदवारांना डावलून भलत्याच उमेदवारांची निवड झाल्याने या संपूर्ण प्रक्रियेत घोटाळा करणारे तहसिलदार प्रशांत घोरुडे यांना तात्काळ निलंबीत करुन चामोर्शी तालुक्याची पूनर्रपरिक्षा घेण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली. पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष बाळु टेंभुर्णे, जी. के. बारसिंगे, बाशिद शेख, दिलीप बांबोळे, कवडू दुधे, शुभम फुलझेलें, समिर दहागावकर, गुलाब अली सय्यद, अंकुश दुर्गे, प्रतिक्षा जवादे, आचल भांडेकर, फिजा शेख इत्यादी उपस्थित होते.


