अशोक खंडारे मुख्य संपादक
सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने आज बैलगाडा
शर्यत आणि तामिळनाडूतील जलीकट्टू या क्रिडाप्रकारावरील बंदीपासून अभय दिले आहे. त्यामुळे राज्यात बैलगाडा शर्यतींच्या आयोजनाला आता
कोणतातही अडसर राहिलेला नाही. सर्वोच्य न्यायालयाच्या निकाला नंतर शर्यतप्रेमींमधून जल्लोश साजरा केला जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे यांच्यासहअनेकांनी
कोर्टाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.सन 2011 मध्ये तामिळनाडूमधील जलीकट्टू,
कर्नाटकातील कंबाला आणि राज्यातील बैलगाडा शर्यतीवर बंदी घालवण्यात आली होती. त्यानंतर तिन्ही राज्यांच्या सरकारांनी वन्यजीव संरक्षण कायद्यात काही सुधारणा करत या क्रिडाप्रकारांना खेळांना मान्यता दिली होती. मात्र त्यानंतर या क्रिडाप्रकारांना सर्वोच्च
न्यायालयात आव्हान दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी सुरु होती. डिसेंबरमध्ये या खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर घटनापीठाने
निकाल राखून ठेवला होता. सर्वोच्च न्यायालयाने राज्य
विधिमंडळांच्या कायद्यात सुधारणा करण्याचा राज्य
सरकारांना अधिकार मान्य करत या तीनही क्रिडा प्रकारांना अभय दिले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आज राज्यात
बैलगाडा शर्यत प्रेमींकडून जल्लोश साजरा केला जात
आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी देखील कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत खेळास सर्वोच्च न्यायालयाच्या
घटनापीठाने हिरवा कंदील दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो.
राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी हा नक्कीच दिलासादायक निर्णय असून बळीराजाच्या कुटुंबशैलीचा अविभाज्य भाग असलेली सर्जा राजाची जोडी पुन्हा एकदा जोमाने उधळणार आहे याचा नक्कीच आनंद आहे.
लोकसभेत बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी पाठपूरावा करणारे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील कोर्टाच्या निर्णयानंतर ट्विटरवर प्रतिक्रीया देताना म्हटले आहे की, बैलगाडा मालक, शौकीन व बळीराजाने काळजात जपलेली या मातीतील बैलगाडा शर्यत कायमस्वरूपी सुरू! हा विजय ऐन बंदीच्या काळात दावणीला बांधलेल्या बैलाला आपल्या मुलांप्रमाणे जीव लावणाऱ्या सर्व बैलगाडा मालकांना समर्पित करतो! शर्यत सुरू करण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्वाचे.
आभार!
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील
कोर्टाच्या निर्णयानंतर ट्विटरवर प्रतिक्रीया दिली आहे. भिर्रर्रर्र.... सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी अखेर कायमची उठवली. यामुळे बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झाला आहे. बैलगाडा शर्यत हा क्रीडाप्रकार ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा आहे. याखेरीज खिल्लार या देशी गोवंशाची यामुळे जपणूक होणार आहे आहे. या निर्णयाबद्दल सुप्रीम कोर्टाचे मनापासून आभार.

