पोषण आहार स्वयंपाकी कर्मचाऱ्यांचे ६ महिन्यांपासुन थकीत मानधन मिळावे: भाकपा एटापल्ली
उपसंपादक प्रविण तिवाडे वैनगंगा वार्ता
:शिक्षणाचे सार्वत्रीकरण करण्याच्या दृष्टीने तसेच शाळेतील विद्यार्थ्यांची पटनोंदणी व उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठी आणि शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबविण्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत शालेय पोषण आहार योजना अंमलात आणल्या गेली. मात्र ही योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असलेल्या स्वयंपाकी कर्मचाऱ्यांना तब्बल सहा महिन्यांपासुन मानधनच देण्यात आले नसल्यामुळे दिवाळी अंधारात गेली. ही योजना राज्य व केंद्र शासनाच्या स्थानिक स्वराज संस्था, खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळा, वस्ती शाळा. महात्मा फुले शिक्षण हमी योजना केंद्रे यांमधिल विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत शालेय पोषण आहार शिजविण्यासाठी १५०० रुपये या मानधनावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान स्वयंपाकी कर्मचाऱ्यांकडेच इंधन खर्च सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली असुन याचा देखील खर्च वेळेवर दिल्या जात नाही. अलिकडे महागाईचा भडका उडाला असताना व प्रती सिलिंडर १ हजार ११८ रुपयावर येऊन ठेपला असताना स्वयंपाकी कर्मचाऱ्यांना मात्र १५०० रुपये या तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे. असे असतानाही स्वयंपाकी कर्मचाऱ्यांनाच स्वयंपाक तयार करण्यासोबतच मुलांना जेवण वाढणे, साफ सफाई करणे आदी कामे करावे लागत आहेत. मात्र मागील सहा महिन्यांपासुन देय मानधन मिळाले नाही ते त्वरित मिळावे ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे भाकपा ता. सचिव एटापल्ली कॉ. सचिन मोतकुरवार यांनी केली आहे.

