जीवीत हानी झाल्यावरच रोडवरील खड्डे दुरुस्ती करणार काय? आ. रामदास मसराम
आरमोरी– जीवीत हानी झाल्यावरच गडचिरोली जिल्ह्यातील खड्डेमय रस्ते दुरुस्ती करणार काय? असा प्रश्न आ.रामदास मसराम यांनी शासनास केला आहे. गडचिरोली मार्गावरील डोंगरगावजवळ पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे सलग ३–४ अपघात घडले असून एक ट्रकही पलटी झाल्याची गंभीर घटना समोर आली आणि गडचिरोली जिल्ह्यातील अनेक रस्ते खड्डेमय आहेत तरीदेखील शासनाने ठोस पाऊल उचलले नाही
गडचिरोली ते आरमोरी मार्गावर अपघात झाल्याचे कळताच आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदासजी मसराम यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता प्रफुल केळकर यांना व्हिडिओ कॉलद्वारे प्रत्यक्ष खड्ड्यांची परिस्थिती दाखवून तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या. तसेच देसाईगंज–कोरची, देसाईगंज–गडचिरोली आणि गडचिरोली–धानोरा या संपूर्ण मार्गावरील सर्व खड्डे त्वरित बुजवून नागरिकांचा प्रवास सुरक्षित करण्याचे निर्देशही दिले.
त्या प्रसंगी धनपाल मिसार सर, खेमराज सामृतवार, पोलीस पाटील वामन राऊत, मधुकर राऊत, राजू ढोरे, हरीश राऊत आदी उपस्थित होते.
जनतेच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड नाही – सुरक्षित रस्ते हीच आमची प्राथमिकता! असे आ. मसराम यांचे म्हणणे आहे

