मानव विकास मिशनच्या बसचा मागील भाग अचानक झाला वेगळा, प्रवासी सुखरूप
अहेरी :- मानव विकास मिशनच्या बसचा मागील भाग अचानक अलग झाल्याची घटना एटापल्ली येथे घडली जिल्ह्यातील लाल परीची व मानविकास मिशन बसांची अत्यंत दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. काल घडलेल्या एटापल्ली येथील धक्कादायक घटनेत धावत्या एसटी बसचा मागील भाग अचानक तुटून रस्त्यावर कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र काही क्षणांचा फरक असता तर मोठी दुर्घटना घडली असती. या घटनेमुळे एसटी महामंडळाच्या देखभाल व्यवस्थेवर आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यातच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची अशी दुरावस्था असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दुर्गम आणि आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात एसटी हीच सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आहे. विद्यार्थी, शेतकरी, महिला, नोकरदार, रुग्ण आणि ग्रामीण भागातील हजारो नागरिक दररोज एसटीवर अवलंबून असतात. मात्र जीर्ण आणि मोडकळीस आलेल्या बसांमुळे प्रत्येक प्रवास जीव मुठीत धरून करावा लागत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नवीन, सुरक्षित आणि अत्याधुनिक एसटी बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. यासाठी विविध सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी निवेदने दिली, आंदोलने केली, मोर्चे काढले; परंतु अद्यापही जिल्ह्याच्या वाट्याला पुरेशा प्रमाणात नवीन बसेस आलेल्या नाहीत. सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन गरजेच्या सुरक्षित सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे दुर्लक्ष होत आहे
नेहमीच भंगार बसेसचा फटका प्रवाशांना बसत आहेत सदर दुर्घटनेत जीवीतहानी टळली आहे

