संपत्तीच्या वादातून आजी-आजोबांसह नातीची हत्या
दोन महिन्यांपूर्वी अहेरी तालुक्यातील महागावात एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या झाली होती.
गडचिरोली : भामरागड तालुक्यातील गुंडापुरीत वृद्ध आजी-आजोबांसह नातीची गळा चिरुन हत्या केल्याची घटना ७ डिसेंबरला उघडकीस आली. संपत्तीच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय असून पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला आहे. दोन महिन्यांपूर्वी अहेरी तालुक्यातील महागावात एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या झाली होती. आणि गुंडापुरीतील तिहेरी हत्याकांडाने जिल्हा हादरला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अर्चना रमशे तलांडे (१०), रा. येरकल ता. एटापल्ली), देवू दसरु कुमोटी (६०), बिच्चे देवू कुमोटी (५५, रा. गुंडापुरी ता. भामरागड) अशी मृतांची नावे आहेत. देवू कुमोटी यांची विवाहित मुलगी मरकल (ता. एटापल्ली) येथे राहते. चौथीच्या वर्गात शिकणारी तिची कन्या अर्चना तलांडे ही दिवाळीच्या सुटीत आजी- आजोबांकडे आली होती. अर्चना तलांडेसह देवू व बिच्चे कुमोटी या तिघांचा गळा चिरलेला मृतदेह ७ डिसेंबरला घरात आढळून आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. घटनास्थळी एटापल्लीच्या बुर्गी (कांदोळी) ठाण्याच्या पोलिसांनी धाव घेतली. पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले आहेत.

