मुंबई:-
राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी भेसळखोरीविरोधात दंड थोपटले आहेत. गणेशोत्सव काळात मिठाईमधील भेसळ रोखत त्यांनी भेसळखोरांना धडा शिकवण्याचा चंग बांधला आहे. सणासुदीच्या काळात भेसळयुक्त पदार्थांनी लोकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने जोरदार कारवाई सुरू केलीय. त्याचा परिणाम म्हणून आजपर्यंत तब्बल दहा कोटींपेक्षा अधिक किमतीचे अन्नपदार्थ आणि प्रतिबंधित पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. शिवाय नाशवंत अन्नपदार्थांचा साठा घटनास्थळीच नष्ट करण्यात आलेला आहे. ही कारवाई अशीच सुरू राहील, असे आत्राम यांनी 'लय भारी'शी बोलताना सांगितले.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री म्हणून राजे धर्मरावबाबा आत्राम यांनी जबाबदारी घेताच कोकणासह मुंबई, नागपूर, अमरावती इत्यादींचा विभाग स्तरावर आढावा बैठक घेऊन त्यांना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर राज्यभरात अधिकाऱ्यांनी कारवाईचं सत्र सुरू केले आहे. कमी कर्मचारी आणि अधिकारी असूनही अगदी सुट्टीच्या दिवशीदेखील कारवाई केली जात आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने खाद्यतेल, दूध तसेच दुग्धजन्य पदार्थ, शिवाय मिठाईमध्ये सर्रास भेसळ केली जाते, असा अनुभव आहे. अशा भेसळखोरांविरोधात सरकाराने ही कारवाईची मोहीम सुरू केली. या भेसळखोरांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री राजे धर्मरावबाबा आत्राम यांनी दिले आहेत.अन्न व औषध प्रशासन विभागात कमी मनुष्यबळ आहे. ते सोडवण्यासाठी मंत्री आत्राम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेतली. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही उत्साह वाढला आहे. गेल्या महिन्यात ८३ कारवायांमध्ये २ लाख ४२ हजार ३५२ किलो भेसळयुक्त अन्नपदार्थांचा साठा जप्त केला. ज्याची किंमत साडेचार कोटी रुपये आहे. त्याचबरोबर गुटखा, पानमसाला आदी प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या साठ्यावर ४६ ठिकाणी कारवाया करून सुमारे ३ कोटी ६ लाख ७२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि या संदर्भा ३९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

