छत्रीचा धाक बसला वाघाला, जीवाच्या आकांताने पळाला जंगलात
चंद्रपूर :-
अंगावर धावून आलेल्या वाघाला साध्या छत्रीच्या साहाय्याने पळवून लावत स्वत:चा व आपल्या दोन बैलांचा जीव एका शेतकऱ्याने वाचवला.वरोरा तालुक्यातील कोडबाळा येथील शेतकरी महेंद्र गारघाटे गुरुवारी आपल्या दोन बैलांना शेतामध्ये नेत होते. गारघाटे यांच्या शेताला लागूनच महसूल विभागाचे झुडपी जंगल आहे. गारघाटे यांनी याच भागात आपले बैल चरावयास सोडले. मात्र आपल्यापासून चाळीस फूट अंतरावरच वाघ बसून आहे, याची त्यांना कल्पनाही आली नाही.
तिथे शेळ्या राखणाऱ्या एका मुलाने फोन करून तुमच्या बैलांजवळ वाघ असल्याची माहिती दिली. गारघाटे क्षणाचाही विलंब न करता बैलाजवळ गेले. वाघाने आपला मोर्चा गारघाटे यांच्याकडे वळविला. त्यांनी छत्री उभारून बंद केली असता वाघ मागे फिरला. आरडाओरडा केल्याने वाघाने जंगलाकडे धूम ठोकली