वंचित बहुजन आघाडी यांची मागणी
प्रविण तिवाडे उपसंपादक वैनगंगा वार्ता
सध्या देशात भारतीय संविधानावर मनुवादी व्यवस्थेकडून सतत हल्ले होत आहेत. संविधानिक मार्गाने सत्तेत जावून हे सत्ताधारी सत्तेचा उपयोग संविधानिक मूल्यांना पायदळी तुडविण्यासाठी करताना दिसत आहेत. परिणामी संविधानाचे महत्व आणि त्यावरील सामान्य लोकांमध्ये विशेषतः तरुण वर्गामध्ये जागरूकता कमी होत चालली आहे. “आम्ही भारताचे लोक....” या संविधानातील प्रास्ताविकेतील पहिल्या वाक्याची प्रत्येक नागरिकाला मारलेली हाक पुन्हा पुन्हा देणे गरजेचे वाटत आहे. त्या सर्वांची एकजूट करणे गरजेचे आहे.
हे वर्ष आपण भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे करत आहोत तर २०२४ हे संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून येवू घातले आहे. “......संविधान कितीही चांगले असले पण त्याची अंमलबजावणी करणारे लोक जर नालायक असतील तर ते संविधान निरुपयोगी ठरेल....” हे संविधान सभेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ऐतिहासिक वाक्य आजच्या घडीला खरे होताना दिसत आहे इतक्या असंविधानिक गोष्टी मनुवादी व्यवस्थेद्वारे घडवून आणल्या जात आहे. याला जबाबदार कोण? हा प्रश्न लोकांमध्ये - नागरिकांमध्ये जावून थेठ विचारण्याची गरज आहे. “.....हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.....” या वाक्याचा तसेच संविधानिक मुल्यांचा अर्थ, त्यातील मुलभूत हक्क आणि कर्तव्य नागरिकांना समजावून सांगण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कडून आपण हा संविधान दिन संविधान गौरव दीन म्हणून २६ नोव्हेंबर रोजी स्थानिक गाव, वार्ड, तालुका, जिल्हा पातळीवर साजरा करावयाचा ठरवीत आहोत.
या दिनी खालील मुख्य कार्यक्रम करणे अपेक्षित आहे.
· सामाजिक न्याय विभागाच्या GR नुसार प्रत्येक गावात ग्राम पंचायतीने “संविधान भवन” उभारण्याचा ठराव करून ही मागणी लावून धरावी. केलेले ठराव हे तहसीलदार, जिल्हा कलेक्टर आणि सामाजिक न्याय विभागात पाठवून द्यावेत. त्याचा नंतर जिल्हा निहाय पाठपुरावा करावा.
· संविधानाच्या प्रस्ताविका आणि त्यातील प्रत्येक मुल्यांचा अर्थ समजावून सांगत सार्वजनिक ठिकाणी जाहीर वाचन करणे.
· शक्य तिथे संविधानांच्या प्रस्ताविकेचे वाटप करणे. दर्शनी भागात किंवा सार्वजनिक ठिकाणी संविधानांच्या प्रस्ताविकेचे लाकडी चौकटी सह बॅनर किंवा installation करावे.
संविधान दिनानिमित्त विविध वयोगटातील व्यक्तींसाठी विशेषतः मुलांसाठी,युवकांसाठी स्पर्धेचे आयोजन करता येवू शकेल. त्यात वक्तृत्व स्पर्धा, वाद विवाद स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, घोषणा स्पर्धा,पथनाट्य,गाणी ई.ई. चा समावेश असू शकतो. त्या करिता विविध वयोगटासाठी पुढील प्रमाणे किंवा या व्यतिरिक्त आणखीही विषय तुम्ही सुचवू शकता... जसे – १. समकालीन भारतीय सामाजिक आणि राजकीय जिवनात संवैधानिक मूल्यांचे महत्त्व २. संवैधानिक मूल्ये आणि भारताची वर्तमान परिस्थिती ३. भारतीय तरूण संवैधानिक मूल्यांची उपेक्षा करत आहे/ नाही .४. संविधानाच्या प्रास्ताविकेच्या पाठांतराची स्पर्धा ५. भारताच्या विकासामध्ये संवैधानिक मूल्यांचे महत्त्व ६. सहिष्णुता आणि भारतीय संविधान ७. धर्मनिरपेक्षता आणि भारतीय संविधान ८. भारतीय तरुण संवैधानिक मूल्य स्विकारत आहे/ नाकारत आहे ९. तृतीय पंथीयांचा लोकशाहीतील सहभाग. १०. संविधानामुळे भारतीय स्त्रियांचा झालेला विकास? ई.ई. यावर आपण चर्चा सत्र, व्याख्यान आदींचे सुद्धा आयोजन करू शकता ·
या शिवाय आपापल्या वार्डात, तालुक्यात, जिल्ह्यात संविधान दिनाच्या निमित्ताने तिरंगा ध्वज हाती घेवून सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेवून स्वातंत्र्य,समता,बंधुता,न्याय,धर्मनिरपेक्षता या मुल्यांचा अर्थ सांगणारे देखावे उभारून रॅली,मार्च काढावेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधानिक मूल्यांबद्दलचे कोट असलेली वाक्य मोठ्या अक्षरातील त्यात असावीत, तसेच संविधान सभेतील भाषणाचा निवडक उतारा त्यात असावा. संविधानाच्या पुस्तिकेची प्रतिकृती केल्यास अधिक उत्तम. रॅली मध्ये संविधान गौरव करणारे, संविधानिक मुल्यांचा अर्थ सांगणाऱ्या घोषणा असाव्यात, त्या आशयाचे घोषणा फलक असावेत, गाणी, कलापथक, पथनाट्य, लोकवाद्य ई.ई. असावेत.
या मोहिमेसंबंधीच्या बातम्या वर्तमानपत्रात, विविध न्यूज चॅनेल मध्ये, सामाजिक माध्यमांमध्ये झळकतील याची काळजी सर्वांनी घ्यावी.
· या पूर्ण मोहिमेचा एक अहवाल तयार करून केंद्रीय कार्यालयात पाठवून द्यावा.
सोबत सामाजिक न्याय विभागाचा प्रत्येक गावात ग्राम पंचायतीने “संविधान भवन” उभारण्या संदर्भातील शासन निर्णय ( GR ) पाठवत आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in यावर उपलब्ध आहे.