गडचिरोली येथे वातानुकूलित उष्माघात कक्षाची स्थापना
नागरिकांना काळजी घेण्याचे जिल्हा शल्य चिकित्सक यांचे आव्हान
गडचिरोली:-
गडचिरोली जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा फटका नागरिकांना बसू लागला असून जिल्हा सामान्य रुग्णालयात उष्माघात कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर जाणे टाळावे तसेच सतत पाणी पित राहावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी केले आहे.
उन्हाचा वाढता तडाखा लक्षात घेता गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दहा बेडचे वातानुकूलित आयसीयू आणि विशेष उष्माघात कक्ष सुरू करण्यात आला आहे. डॉ. वर्षा लहाडे यांनी नागरिकांना काकडी, कलिंगड यांसारख्या पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या फळांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला आहे.
डोकेदुखी, चक्कर येणे, बेशुद्ध पडणे ही उष्माघाताची प्रमुख लक्षणे असून अशी लक्षणे आढळल्यास तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी यावे, असेही त्यांनी सांगितले. सध्या उष्माघाताची लक्षणे असलेले दोन रुग्ण रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.

